💥 “पालिवाल पॅटर्न”मुळे मनपाचे एक कोटींचे नुकसान?
मे. सूर्यवंशी इंटरप्राईजेसला 3.5 कोटींचे रस्ता दुभाजक काम
50 लाखांचे “टोकन” कमिशनचा आरोप — माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांचा गंभीर खुलासा
चंद्रपूर :
बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज या मार्गावर जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेला रस्ता सोडून, त्याच मार्गावर तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाच्या कामाचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेतून मंजूर करण्यात आला.
माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या निर्णयावर गंभीर आक्षेप घेत मनपावर मे. सूर्यवंशी इंटरप्राईजेसला लाभ मिळवून देण्यासाठी मुद्दाम हा अट्टाहास करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल यांना ५० लाख रुपयांचे कमिशन स्वरूपात “टोकन” मिळाल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या हाती आली आहे.
“स्पर्धा थांबवून लाभ देण्याचा डाव”
शहरातील इतर कामांमध्ये — जसे की इरई नदीकाठी तयार करण्यात आलेले विसर्जन कुंड, सिमेंट काँक्रीट प्लॅटफॉर्म आणि अंतर्गत रस्ते दुरुस्ती — कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा अनुक्रमे २२%, ३४% आणि २५% कमी दरात काम घेतले.
परंतु रस्ता दुभाजकाच्या ३.५ कोटींच्या कामात मात्र, फक्त ०.०१% कमी दरातच निविदा मंजूर करण्यात आली, जे स्पष्टपणे संशयास्पद असल्याचे देशमुख म्हणाले.
या निविदा प्रक्रियेत पाचपैकी तीन एजन्सी अपात्र ठरवण्यात आल्या, कोणतेही ठोस कारण न देता. परिणामी, स्पर्धा संकुचित झाली आणि मर्जीतल्या कंत्राटदाराला लाभ मिळाला. या प्रक्रियेमुळे मनपाचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान आणि कंत्राटदाराला तेवढाच नफा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
“पालीवाल पॅटर्न” म्हणजे काय?
देशमुख यांनी माजी आयुक्त पालीवाल यांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवत म्हटले आहे —
<span;>> “कामाची गरज असो वा नसो, कंत्राटदारासाठी सोयीचे आणि नफा देणारे काम काढायचे. निविदेत हेतूपुरस्पर अपुरी माहिती द्यायची. दलाली करणारे अधिकारी कंत्राटदारांना घाबरवायचे. इच्छित कंत्राटदाराशिवाय इतरांना अपात्र ठरवून स्पर्धा संपवायची. आणि शेवटी रोख कमिशन घेऊन निविदा मंजूर करायची — हा होता ‘पालीवाल पॅटर्न’!”
पुढे काय?
या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावेत तसेच रस्ता दुभाजकाचे काम त्वरित रद्द करावे, अशी मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात आली असून, लवकरच या विषयावर मोठे जन आंदोलन छेडले जाणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.



