Friday, April 17, 2026
Google search engine

माणूस आणि समाज

माणसाचे मन नेहमी भुकेलेले असते. त्याला प्रेम हवे असते. सोबत हवी असते. विचारांचे खाद्य हवे असते. हे सर्व समाज पुरवीत असतो म्हणून माणूस हा समाजप्रिय प्राणी झाला. तो एकटा कधीच राहू शकणार नाही. आपण, आपले कुटुंबीय, आपले नातेवाईक, शेजारी, मित्र, व्यावहारिक संबंधांतून आपल्या संपर्कात येणारे, इत्यादींचे संघठन म्हणजे समाज.

आपल्या जन्मापूर्वी हा समाज होता, आपल्या मरणानंतर हा समाज राहणार आहे. आपण व्यक्तिश: या समाजाचे एक घटक आहोत ही जाण माणसाने ठेवली पाहिजे. मानवी समाजाला एक संस्कृती असते. या संस्कृतीचे काही नीती-नियम असतात. माणूस या नीती-नियमांचा भंग करतो, तेव्हा आपण त्याला समाजदोही म्हणतो. मानवी समाजात साजरे होणारे विविध समारंभ, उत्सव, त्या समाजाच्या चाली-रीती, या सर्वांची एक विशिष्ट चौकट तयार झालेली असते. माणूस त्या चौकटीबाहेर जाऊ शकत नाही.

माणसाचे सामाजिक जीवन सुरळीत चालावे यासाठी मानवाने राज्यसंस्था, शैक्षणिकसंस्था, धर्मसंस्था, विज्ञानसंस्था, अर्थसंस्था इत्यादींची निमिर्ती केली. समाजजीवन अधिक सुखी, समृद्ध, समाधानी व्हावे म्हणून या संस्थांमधल्या प्रतिभावान व्यक्ती कार्यरत असतात. समाजामध्ये परोपकारी, निष्काम कार्य करणारी मंडळी सुध्दा असतात, तेव्हा तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असतो.

परंतु समाजात स्वाथीर दुष्टप्रवृत्तीच्या माणसांचे प्राबल्य वाढते तेव्हा समाजात अशांती, असमाधान निर्माण होते. आजकाल ज्याच्याकडे सत्ता-संपत्ती आहे त्यालाच समाजात मान मिळतो. हे निरोगी समाजाचे लक्षण नाही.

पूर्वकाळात ‘समाज’ म्हणजे सर्व जातींच्या, धर्मांच्या लोकांचा समूह असा होता. परंतु आजकाल ‘समाज’ याचा अर्थ संकुचित झाला आहे. प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या जनतेने आपापले समाज निर्माण केले आहेत, यात गैर काही नाही. परंतु त्यात स्पर्धा, हेवेदावे, उच्चनीचता या भावनांमुळे ‘मानवसमाज’ या संकल्पनेला धक्का पोचत आहे. जो तो आपापल्या समाजापुरते पाहू लागला आहे.

त्यामुळे मानवीसमाज या संज्ञेला तडे जाऊ लागले आहेत. समाजात गायक, विविध वाद्यं वाजवणारे, नट-नट्या, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कवी, शेतकरी, कुंभार, सुवर्णकार, चर्मकार इत्यादि विविध कार्य करणारे सर्वजण असावे लागतात. या विविधतेत आनंद आहे. प्रत्येकाने दुसऱ्याचा आदर केला पाहिजे.


‘एखाद्या समाजाची प्रकृती आणि प्रवृत्ती समजून घ्यायची असेल तर तो समाज साहित्यिक, शेतकरी आणि सैनिक यांचा किती आदर करतो त्यावर अवलंबून असते. ‘समाजात विविधता असते त्याप्रमाणे निसर्गातसुद्धा विविधता आहे. सर्व फुले आणि सर्व फळे एकाच रंगाची आणि एकाच चवीची असती तर त्यात कुठला आनंद राहिला असता? निसर्गात विविधता आहे, तशीच समाजातसुद्धा ती असली पाहिजे.

प्रत्येकाने आपले समाजसेवेचे कर्म ठरवून घ्यावे. समाजसेवा हीच खरी मानवसेवा आहे.  समाजात कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही. आपल्या संस्कृतीत वर्णावर्णात उच्च-नीचता आली तेव्हा आपला समाज आतून पोखरला जाऊ लागला.

लोकसंख्येत एवढी वाढ झाली आहे की समाजात आपुलकी, प्रेमभावना नष्ट होत चालली आहे. प्रत्येकजण स्वत:चे प्रश्न सोडविण्यात एवढा गर्क झाला आहे की सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही.

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आपली सुख-दु:खे सांगण्यासाठी हक्काची माणसे दुमिर्ळ होत आहेत. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांत नैराश्य निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना आपुलकीने जवळ घेणारे शिक्षक कमी झाले आहेत. व्यापारात खोट आल्यामुळे सर्व कुटुंबाला मारून स्वत: आत्महत्या करणारे लोक आपण पाहत आहोत.

आज समाजात नि:स्वार्थी सज्जन, परोपकार करणारे किती लोक उरले आहेत? लोकसंख्येचा विचार करता त्यांची संख्या नगण्य आहे. आजचे राजकीय पुढारी किती नि:स्वार्थ आहेत? ज्या पुढाऱ्यांना लोकसेवा करायची आहे, त्यांनी स्वत: नि:स्वार्थी असले पाहिजे. समाजासाठी काहीतरी करण्यासाठी स्वत: त्याग करावा लागतो. आजच्या पुढाऱ्यांत कितीजण त्यागी आहेत, हा मोठा प्रश्न आहे. म्हणुन आधी आपल्यातिल आपन मानुसकी जपली पाहिजे. तरच कुठे तरि मानुस आणि समाजाची प्रगती हाेईल?

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Latest News

Most Popular News

You cannot copy content of this page